हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना दिलासा; BCCI ने रद्द केले निलंबन
हार्दिक पांड्या, कारण जोहर आणि केएल राहुल (Photo Credits: Instagram)

‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शो मध्ये केलेली वक्तव्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना चांगलीच भोवली. लोकांकडून या दोघांवर बरीच  टीका झाली. शेवटी बीसीसीआयने (BCCI) कमिटी ऑफ अडमिनिस्ट्रेशनच्या (COA) सह घेतलेल्या निर्णयाद्वारे या दोघांना निलंबित केले होते. हार्दिकने जाहीर माफी मागूनही हे प्रकरण काही मिटले नाही. शेवटी या दोघांविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आता या दोघांना दिलासादायक गोष्ट घडली आहे. बीसीसीआयने या दोघांचेही निलंबन रद्द केले आहे. हे दोन्ही खेळाडू आता सामन्यांमध्ये खेळू शकतात. मात्र या दोघांविरुद्धची चौकशी चालूच राहणार आहे.

या शो दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताने हे दोघेही वाहवत गेले. महिलांबद्दल असलेले आपले विचार या दोघांनी बऱ्याच स्पष्टतेने मांडले आणि नवीन वादाची ठिणगी पडली. त्यानंतर जनतेसह इतर अनेक खेळाडूंनीही या गोष्टीवर टीका केली. हरभजन सिंगने तर ‘ज्या गाडीत राहुल आणि हार्दिक असतील त्या गाडीतून आपल्या पत्नी आणि मुलींना पाठवणार नाही’ असे भाष्य केले होते. मात्र आता या दोघांचे निलंबन टळले आहे.