कौमार्य चाचणी विरोधात लढणारी ऐश्वर्या येताच दांडीया बंद, निघून जाता पुन्हा सुरु
(संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

ऐश्वर्या भाट-तमायचीकर यांना दांडिया खेळण्यास संतापजनक विरोध झाल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड येथे घडल्याचे समजते. हा प्रकार पिंपरी चिंचवड येथील भाटनगर येथे घडला. ऐश्वर्या यांनी कौमार्य चाचणीस विरोध केला होता. त्या खराडीत राहतात मात्र, त्या माहेरी आल्यामुळे त्या भाटनगर येथील देवीच्या दर्शनासाठी गेल्या होता. उपस्थित महिला तेथे दांडीया खेळत होत्या. दरम्यान, ऐश्वर्या यांनीही दांडी खेळण्यास सुरुवात केली असता खेळच बंद करण्यात आला.

दांडीया बंद, डीजे सुरु

दरम्यान, दांडीयाचा खेळ बंद करुन डीजे सुरु करण्यात आला. उपस्थीत युवक डीजेवर नाचू लागले. हा संतापजनक प्रकार पाहून ऐश्वर्या यांनी फोन करुन एका मैत्रिणीस बोलावले. त्या मैत्रिणीला घटास्थळी उभे करुन त्या पोलिसांत गेल्या. ऐश्वर्या गेल्याचे पाहताच पुन्हा डीजे बंद करुन दांडीया सुरु करण्यात आला. या प्रकाराची माहिती ऐश्वर्या यांच्या मैत्रिणीने ऐश्वर्या यांना दिल्याचे एबीपी माझाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, वॉर्डनकडून विनयभंग; वसतिगृहाच्या खोलीत मुलीला चक्क नग्न केले)

दरम्यान, 'आपण कौमार्य चाचणीला विरोध केल्यानेच आपल्यासोबत हा प्रकार घडवून आणला', असा आरोप ऐश्वर्या यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत आपण पिंपरी पोलिसांत तक्रार दिली आहे. आपण दिलेल्या जबाबानुसार आज दुपारपर्यंत गुन्हा दाखल होईल, असेही ऐश्वर्या यांनी म्हटले आहे.

ऐश्वर्याचा लढा

समाजात असणाऱ्या 'कौमार्य चाचणी'च्या अनिष्ठ रुढींला ऐश्वर्याने विरोध दर्शवला आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:पासूनच सुरुवात केली. तसेच 'Stop 'V' Ritual'युवकांना एकवटून लढा सुरु केला. हा लढा सुरु असलेल्या वर्षाच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरु केला. तसेच, मे महिन्यात त्यांचा स्वत:चा विवाह झाला. यावेळी त्यांनी स्वत: कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला. त्यांच्या या विरोधाचे जोरदार पडसाद समाजात उठले. जात पंचायतीनेही त्यांना कडाडून विरोध केला. ऐश्वर्या यांच्यामुळे समाजाची बदनामी होत आहे. असाही आरोप त्यांच्यावर वारंवार करण्यात आला आहे. मात्र, तरीही त्यांनी आपला लढा निकराने सुरु ठेवला आहे.