17 जूनपासून मुंबईत राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु; 12 दिवस चालणार कामकाज, 18 जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ (Photo Credit : Youtube)

राज्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2019) यावर्षी 17 जूनपासून सुरु होणार आहे. यंदा हे अधिवेशन 3 आठवडे चालणार असून, यामध्ये एकूण 12 दिवस कामकाज पार पडणार आहे. पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच (Mumbai) होणार असून, नागपुरात पूर्वीप्रमाणे हिवाळी अधिवेशन होणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले होते, मात्र पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे हे अधिवेशन मधेच बंद करण्यात आले होते.

17 जूनला या अधिवेशनाला सुरुवात होऊन, 18 जुन रोजी राज्याचा अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. त्यानंतर यानंतर 21 व 24 जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होईल. 19 व 20 जून रोजी राज्यपालांचे अभिभाषण चर्चा होईल. (हेही वाचा: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले हे 7 महत्वाचे निर्णय; आता पडणार कृत्रिम पाऊस, विद्युत शुल्क झाले माफ)

दरम्यान, पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार शक्य असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. 5 ते 10 जून दरम्यान हा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या रिकाम्या असलेल्या पदांवर कोणत्या नेत्याची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.