प्रेमविवाह केला आहे? की करायचा आहे? जाणून घ्या फायदे तोटे
Side Effects of Love Marriage | | (Photo courtesy: archived, edited images)

Side Effects of Love Marriage: तुम्ही मुलगी असा किंवा मुलगा. तुमचे प्रेमसंबंध सुरु आहेत आणि जर तुम्ही प्रेमविवाह (Love Marriage) करु इच्छित आहात. तर, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. कारण आम्ही आपल्याला सांगत आहोत प्रेमविवाह करण्याचे फायदे ( Advantage of Love Marriage) काय आणि तोटे (Disadvantages of Love Marriage) काय. खरेतर परंपरावादी अनेक लोक प्रेमविवाहाला कडाडून विरोध करतात. तर, आधुनिक विचारांचे लोक प्रेमविवाहाला पाठींबा देतात. या विषयावर चर्चा करावी तितकीच थोडीच आहे. त्यामुळे चर्चेच्या फंदात न पडता आम्ही इथे आपल्याला थेट फायद्यातोट्यंबाबतच सांगत आहोत. त्यामुळे तुम्ही जर प्रेमविवाह केला आहे किंवा करणार आहात तर आगोदर ही माहिती जरुर वाचाच.

जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य

प्रेमविवाहाचा फायदा असा की, तुम्हाला मनासारखा जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मिळते. सुनियोजीत विवाहाप्रमाणे इथे तुम्हाला कोणी लग्न करण्याचे बंधन करत नाही. इथे हे कपल स्वत:हून विवाह करण्याचा निर्णय घेते. तो सर्वस्वी त्या दोघांचा निर्णय असतो. इथे तिसऱ्या व्यक्तिचा शक्यतो हस्तक्षेप असत नाही. त्यामुळे पुढे आयुष्यही स्वतंत्रपणे जगता येऊ शकते.

दुसऱ्या बाजूला तोटा असा की, प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांमद्ये हे विवाह टिकण्याचे प्रमाण म्हणावे तितके अधीक नाही. पुढे एकमेकांशी पटले नाही तर अनेकदा प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. त्यात आणखी एक मुद्दा असा की, अरेंज मॅरेज असेल तर कुटुंब, नातेवाईक अशी मंडली तो संसार वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण, इथे या दोघांचाच मामला असल्यामुळे त्यांच्या कोणी हस्तक्षेप करत नाही. परिणामी ठिणग्या ठरलेल्या. त्यामुळे चिंता, अनिश्चितता असा धोका सतत राहू शकतो. घरच्यांनी स्वीकारले नाही तर, कुटुंबांची ताटातूनट अनुभवायला मिळू शकते. (हेही वाचा, छे..! कुंडलीचं काय घेऊन बसलात; लग्नाआधी करा या ५ मेडिकल टेस्ट)

आई-वडील, कुटुंबाचा सहभाग

प्रेमविवाहात आई-वडील, कुटुंब, वडिलधारी मंडळी यांचा थेट संबंध येत नाही. लोक आपला जोडीदार स्वत: निवडतात. फक्त शक्य असेल तर, तशी कल्पना घरातील मंडळींना देतात. इथे तोटा असा की, अनेकदा प्रेमविवाह दोन्हीकडील किंवा दोघांपैकी एकाच्या घरात स्वीकारला जात नाही. त्यामुळे दोघांचेही कुटुंबासोबतचे नाते तुटते. अशा वेळी नात्यत दुरावा निर्माण होतो. रक्ताच्या नातेवाईकांकडून हवा तसा पाठींबा मिळत नाही.

परस्पर परिचय

प्रेमविवाहाचे प्रमुख कारण म्हणजे सहवास. लग्नापूर्वीच हे जोडपे एकत्र आल्यामुळे एकमेकांना जाणून घेण्याची संधी असते. आपल्या आवडीनिवडी, सवयी, आपेक्षा, गुण, दोष हे सर्व आगोदरच माहिती असते. त्यामुळे भविष्यात संसार करताना फारशा अडचणी उद्भवत नाहीत. मात्र, तोटा असा की, ज्या सहवासातून विवाह होतो तो सहवास किती आणि कसा लाभला आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. लग्नापूर्वी सहवासात असताना जर दोघांनीही एकमेकांना जाणून घेतले नाही तर, भविष्यात लग्नापूर्वी तू असा नव्हतास किंवा तू अशी नव्हतीस. लग्नानंतर खूपच बदलला/बदलली अशी वाक्ये एकमेकांना ऐकवली जातात. त्यातून वाद वाढतो. वेळीच त्याला लगाम घातला नाही तर, नात्यातला ताण वाढून ते तुटण्याची शक्यता निर्माण होते.

थोडक्यात

इथे दिलेले मुद्दे आणि त्याचे स्पष्टीकरण हे ढोबळमानाने दिले आहे. त्यात आणखी काही मुद्द्यांची भर टाकता येऊ शकते. मूळ मुद्दा असा की जगातील प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. त्यामुळे ती गोष्ट करताना प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवरच करायची असते. प्रेमविवाहाचेही तसेच असते. जगाने काहीही म्हटले सांगितले तरी, ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीप्रमाणे निर्णय स्वत:च्या मनानेच घ्यावा. तो घेतल्यानंतर त्याच्या परिणामांची जबाबदारीही स्वीकारायची तयारी ठेवावी.