Tulsi Vivah 2018 : तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?
तुळस - शाळीग्राम विवाह Photo credit : twitter

Tulsi Vivah 2018 : दिवाळी सणाची सांगता तुळशीच्या लग्नाने केली जाते. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न पार पडतं. देवउठनी एकादशीला (Dev uthani ekadashi) विष्णू देव चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात त्यामुळे या एकादशीनंतर लग्नासारख्या मोठ्या सेलिब्रेशनला, चांगल्या कामांना सुरुवात केली जाते. प्राचीन काळापासून तुळशी विवाहादिवशी  (Tulsi vivah) तुळशीचं लग्न घरातील किशोरवयीन मुलासोबत किंवा शाळीग्राम दगडासोबत केलं जातं. शाळीग्रामासोबत तुळशीचं लग्न लावण्याच्या प्रथेमागील कहाणीदेखील तितकीच खास आहे.

तुळशीचं लग्न शाळीग्रामासोबत का होतं ?

आख्यायिकेनुसार, जालंधर हा तुळशीचा पती होता. तो अत्यंत अत्याचारी होता. विष्णू देवाने तुळशीला,' तू माझ्या सेवेत असे पर्यत तुझ्या पतीला युद्धात कोणीच मारू शकत नाही. ' असे वरदान दिले होते. त्यामुळे जेव्हा जालंधर युद्धात जायचा तेव्हा तुळस विष्णूंच्या सेवेत असायची परिणामी जालंधर विजयी ठरायचा. मात्र असेच चालू राहिल्यास भविष्यात जालंधर संपूर्ण विश्वावर राज्य करेल आणि साऱ्या संसारात त्याच्या अत्याचाराचा हाहाकार पसरेल अशी भीती महादेव शंकरानी बोलून दाखवली.

जालंधराला संपवण्यासाठी महादेवांनी विष्णूला जालंधराचं रूप घेऊन तुळशी समोर जाण्यास सांगितले. यामुळे तुळस विष्णूजींची पूजा करत नसल्याची वेळ साधत जालंधरावर हल्ला करण्यात आला. तुळशीच्या समोर जालंधराचं मुंडकं आणि धड वेगवेगळ्या स्थितीत पडलेलं रूप पाहून तिला जबर धक्का बसला. विष्णू देवांनी माझ्या भावनांचा अनादर केल्याच्या रागाने तिने त्यांना रागाच्या भरातच दगड बनण्याचा शाप दिला.

विष्णूला दगडाच्या स्वरूपात पाहून साऱ्या सृष्टीने तुळशीकडे शाप मागे घेण्याची मागणी केली. तुळशीनेही हा शाप मागे घेत जालंधरासोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस तुळशी शिवाय प्रसादाचा स्वीकार न करण्याचा निर्णय विष्णू देवांनी जाहीर केला. म्हणुणच देव उठनीनंतर कार्तिक महिन्यात शाळीग्राम रूपातील विष्णू सोबत तुळशीचा विवाह केला जातो. Tulsi Vivah 2018: तुळशी विवाहाचा मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह ?

तुळशीचा आणि शाळीग्राम दगडाचा विवाह केल्याने कन्यादान केल्यासारखे पूर्ण मिळते अशी समजूत आहे. त्यामुळे दांपत्यांच्या जीवनातील सुख, शांती समाधान वाढत राहावे याकरितादेखील तुळशीचं लग्न लावलं जातं