भाजपमध्ये खळबळ! मोदींना हटवा, गडकरींना पाठवा; शेतकरी नेत्याची आरएसएसकडे मागणी
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान | (Photo courtesy: Archived, Edited Images)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा जोरदार पराभव झाला. त्यानंतर भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. महाराष्ट्रातील राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसवक संघाला पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी 2019 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार बदलावा अशी मागणी केली आहे. 2019साठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना हटवून त्या जागी नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावाची घोषणा करावी असे तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

2019 मध्ये जर भाजपला विजय मिळवायचा असेल तर, नितिन गडकरी यांनाच पंतप्रधान पदाचा चेहरा पुढे आणायला पाहिजे असेही तिवारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, तिवारी यांच्या पत्राबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसा प्रतिक्रिया देतो याबाबत उत्सुकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे निवडणुकीच्या मैदानात केवळ गर्दीच नव्हे तर, जनमतासोबत विजयही खेचून आणणारा भाजपचा सर्वोच्च ब्रॅंड. 2014 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून पंतप्रधान मोदी, गर्दी आणि निवडणुकांतला विजय हे समीकरण अधिक घट्ट होत गेले. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात आमच्याकडे उमेदवार नाहीत पण, मोदी आहेत, असे म्हणण्यापर्यंत भाजप नेत्यांची मजल गेली. सुरुवातीच्या काही काळात मोदी ब्रॅंडकडे पाहून जनतेनेही भाजपच्या बाजूने कौल दिला. त्यातून मोदी लाट हा शब्दप्रयोगही वापरला जाऊ लागला. पण,नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये भाजपचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे या राज्यात मोदी ब्रॅंड चालला नाही. तसेच, या ब्रॅंडची लाटही राहिली नाही, त्यामुळे थेट भाजपच्या गोटातून मोदींच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित केली जाऊ लागली. आता तर, या शंकेचे रुपांतर थेट नेतृत्व बदलाच्या मागणीत झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिवारी यांनी हे पत्र आरएसएसकडे पाठवले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर मंगळवारी (18 डिसेंबर) आले होते. त्यांनी मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील कल्याण-भिवंडी आणि पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन केले. किशोर तिवारी हे वसंतराव नाइक शेती स्वालंबन मिशन (VNSSM)चे चेअरमन आहेत. त्यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि जनरल सेक्रेटरी भैय्याजी जोशी यांना पत्र लिहून ही मागणी कळवली आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर धारधार शब्दांत निशाणा साधण्यात आल्याचे समजते. (हेही वाचा, दोस्तीचे पक्के कमलनाथ; राहुल गांधी यांच्या सोबतच संजय गांधी यांनाही दिले पोस्टरवर स्थान)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अहंकारी नेते हेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तिसगड याराज्यांतील भाजप पराभवाचे कारण आहे. नोटबंदी, जीएसटी, तसेच इंधन दरात सातत्याने होत असलेली वाढ, जनहिताच्या विरोधातले निर्णयाचा हा परिपाक आहे. हे नेते पक्ष आणि सरकारमध्ये हुकुमशाहीचा दृष्टीकोन ठेवतात. त्यांचा हा विचार लोकशाही आणि देशासाठी घातक आहे. या आधीही या चुका घडल्या आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर, 2019मध्ये नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायला हवे.