तुमच्या नेत्याने आचार संहितेचा भंग केल्यास 'या' पद्धतीने तक्रार करा, निवडणुक आयोग करणार कारवाई
तुमच्या नेत्याने आचार संहितेचा भंग केल्यास 'या' पद्धतीने तक्रार करा, निवडणुक आयोग करणार कारवाई (फोटो सौजन्य-ट्वीटर)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जवळच येऊन ठेपल्या आहेत. तसेच सात टप्प्यात देशात होणाऱ्या निवडणुकीसाठी नागरिकांना निवडणुक आयोगाने (Election Commission) यंदा काही हक्क दिले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा आदर्श आचार संहिता उल्लंघन करत असलेल्या नेत्याविरुद्ध तक्रार करु शकणार आहात. त्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की 100 मिनिटांच्या आतमध्ये निवडणुक आयोग या नेत्याविरुद्ध कारवाई करणार आहे. तर जाणून घ्या कशा पद्धतीने तुम्ही नियम तोडणाऱ्या नेत्याबद्दल तक्रार करु शकणार आहात.

निवडणुक आयोगाने 'सी विजिल' (cVIGIL) नावाचे एक अॅप लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून देशातील कोणताही नागरिक आचार संहिता लागू झाल्यानंतर नेत्याने कोणत्याहीप्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची तक्रार करु शकणार आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही सरळ निवडणुक आयोगासोबत जोडले जाणार आहात. भारतात होणाऱ्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी अशा पद्धतीचे अॅप लॉन्च करण्यात आले आहे.(हेही वाचा-मतदार यादीमधून देशातील तब्बल 2 कोटी 10 लाख महिलांची नावे अदृश्य)

तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला फोटो, व्हिडिओ काढण्याचे ऑप्शन दिसून येईल. त्यानंतर तुमचे नाव, ठिकाणासह अन्य महत्वाची माहिती या अॅपद्वारे द्यायची आहे. तसेच ओटीपी मोबाईलवर आल्यानंतर तुमचे नाव या अॅपवर रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यानंतर आचार संहिता लागू झाल्याने कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्या नेत्याचा फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही येथे अपलोड करु शकणार आहात. मात्र जर तुम्हाला तुमची ओळख गुपित ठेवायची असल्यास त्याबद्दल ही ऑप्शन देण्यात आलेला आहे.

कोणत्या नेत्याने या प्रकारे वर्तवणुक केल्यास तुम्ही तक्रार करु शकता:

>जर कोणताही नेता पैसे, गिफ्ट, कूपन्स किंवा दारु विक्री करत असेल अशा नेत्याची तक्रार तुम्हाला करता येणार आहे. त्याचसोबत कोणत्याही परवानगीशिवाय पोस्टर किंवा होर्डिंग्ज लावण्याची मान्यता नाही.

>पोलिंग बूथच्या 200 किमी अंतरच्या आतमध्ये कोणताही नेता निवडणुकीच्या प्रचारात सांप्रदायिक भाषण देत असल्याची त्याची तक्रार सी विजिल अॅपच्या माध्यमातून नागरिकांना करता येणार आहे. तसेच तक्रार नोंदवण्यासाठी 1950 हा क्रमांकसुद्धा निवडणुक आयोगाने उपलब्ध करुन दिला आहे.

देशात येत्या 11 एप्रिल पासून ते 19 मे पर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले जाणार आहे. तर 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लावण्यात येणार आहे.